हा ब्लॉग शोधा

रविवार, ९ जून, २०१३

परदेशस्थाचं मनोगत

गांव सोडुनी शहरी आलो
झालो केवळ अन पोटार्थी
परंतु जेव्हा देश बदलला
होउ लागली इच्छापूर्ती

का नाकारु? इथे लाभली
आयुष्याला अवीट गोडी
स्थावरता अन सुरक्षितता
साचत गेली...थोडी...थोडी...

भले आठवे घाट भंगला
...आणि वांत ती माजघरातिल
परंतु वाटे बरी स्वच्छता
शरिरांची अन मनामनांतील

सण थोडे अन थोडे उत्सव
सदैव परके... हे ही वास्तव
स्वदेशात ना लाभे सुख जे
यावे लागे येथे त्यास्तव

मर्ढेकर, कुसुमाग्रज म्हणती
काही वंचना होई तैशी
मध्यमवर्गिय निम्न मात्र मी
कौटुंबिकता विसरू कैशी?

हा ही माझा, तो ही माझा
देश तसे हे दोन्ही माझे
परदेशातिल स्थायिकतेचे
का वाटावे उगाच ओझे?

- निलेश पंडित

 

२ टिप्पण्या:

  1. खूप साध्या वाटणाऱ्या शब्दात अन पादाकुलकासारख्या प्रवाही वृत्तात आजच्या काळातील परदेशस्थ भारतीयाच्या मनातले एक मोठे द्वंद्व अगदी नेमकेपणाने मांडले आहे तुम्ही निलेश, लेखनशुभेच्छा .

    उत्तर द्याहटवा