हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

गद्य


दोन चार महिन्यांपूर्वी
कुठल्याशा लग्नात
चार मित्र
मला पाहताच चपापले
गप्प झाले
मग हळूच उद्गारले
"तुझ्यासमोर शांतताच बरी
आमचं ऐकशील
कवितेत लिहिशील!"

काल हिला
गजरा आणला
स्वतः च्या हातांनी
गेलो माळायला
मोहक लाजली
लगेच सावरली
हलकेच म्हणाली
"नको..माझा चेहरा पहाल..
लगेच कवितेत लिहाल!"

कहर झाला काल रात्री
काव्य प्रेरणा
आली स्वप्नात
त्राटिकेच्या वेषात
घेऊन जड शिळा हातात
संसारयज्ञात...
टाकायला
म्हणाली किती गोष्टी
नजरेतून सुटतात
लाज नाही वाटत तुला?

दचकून - जागा होऊन
सध्या जगतोय गद्यातून !


- निलेश पंडित
३० ऑगस्ट २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा