परदेश गाठताना इतकेच भान आहे
बाजार तेज आहे, विकणे इमान आहे
जन्मून तेथ आलो येथे बिया रुजवण्या
माती जरी निराळी शेती समान आहे
काटेकुटे जरासे छळतात पावलांना
होते जसे स्वदेशी, इथलेहि रान आहे
भाषा जरी निराळी, वृत्ती तशीच सगळी
म्हणती बळेच 'माझी भूमी महान आहे'
खादीतला असो वा लाभो कुणी फिरंगी
दिसता हुजूर आम्हा खालीच मान आहे
गाळून घाम पैसा मिळता अता उमगते
भागेल ना कधीही असली तहान आहे
- निलेश पंडित
१३ डिसेंबर २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा