(वृत्त: आनंदकंद)
आल्या सरी स्मृतींच्या आयुष्य वेचताना
भांबावलो जरा तो पाऊस झेलताना
दुष्काळ फक्त आला नशिबात नित्य माझ्या
धास्तावतो अताशा आनंद पेरताना
तो काळ मुद्दलाचे देऊन स्वप्न गेला
व्याकूळ आज होतो मी कर्ज फेडताना
देतेस तूच शक्ती नसलीस तू तरीही
ओझे जुन्या क्षणांचे आजन्म पेलताना
खेळून काळ गेला गेलीस त्यासवे तू
मोहात जीर्ण उरलो मी खेळ खेळताना
आहे अजून जागा होती तशी रिकामी
दोघांस मोजल्याने आयुष्य बेतताना
- निलेश पंडित
१२ जुलै २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा