हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

दोष

(वृत्त: उद्धव)

ओघळले अश्रू काही
हातातुन सुटला हात
खिळले वाटेवर डोळे
उरलेल्या अंधारात

दुसऱ्या हातात चिमुकले
धन तुझेच आहे धरले
ज्या आधाराने माझे
जग आहे मी सावरले

मी तमातही आताशा
एकाकी सावध असते
साधेपण कुरूपतेला
हृदयाशी धरून वसते

सामाजिक कवचापाशी
अडतात बरसते घाव
कौटुंबिक कुंपण रोखे
ओंगळ सर्पांची धाव

पण आहे वणवा एक
अंतर्यामी माझ्याही
तो शमवावा विझवावा
हे माझ्या नशिबी नाही

ह्या अस्थिरतेतच माझ्या
जर कुठे घसरला पाय
मी मलाच सावरताना
तो दोष कुणाचा … काय … ?

- निलेश पंडित
१२ नोव्हेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा