हा ब्लॉग शोधा

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

विषवल्ली

(वृत्त: हरिभगिनी)

कधी न सुटणाऱ्या प्रश्नांचा वाढत जाताना गुंता
डाचत जाई सातत्याने अर्थहीनतेची चिंता

विषवल्लीचे बीज नेमके अमृतकुंभी रुजलेले
उदात्त उन्नत जे जे ते ते अंतरात का कुजलेले?

अंतर्यामी तकलादू पण बाह्यांगी वटवृक्ष जणू
वनस्पती माझीच जुनी जी तिच्या मुळाशी कसे खणू?

प्रश्न असे ना पडता अनेक जगती जेव्हा सुखे इथे
विषामृताचे उत्तर मिळते अवचित तेव्हा मला तिथे

खंत वाटते मीही त्यांच्यामधील असतो एक कधी
सृष्टी दृष्टीआड ठेवतो बुद्ध्या जपतो समृद्धी

क्रियाहीनतेतून नेहमी मतीहीनता हे कळते
एक नासतो अनेक त्यातुन अन् मग अवघे जग जळते


- निलेश पंडित
२३ नोव्हेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा