(वृत्त: व्योमगंगा)
शब्द माझे संपले पण बोलणे राहून गेले
भेटले डोळे तरी ओलावणे राहून गेले
स्वप्न वेडे पाहिले होतेस तू ते जाणले मी
नेमक्या वेळी तुला मी सांगणे राहून गेले
देह देहा सावलीला सावली कवळून गेली
मन मनाशी मात्र तेव्हा जोडणे राहून गेले
भाळलो मी भाळली होतीस तूही कैक वर्षे
आपले ते भाळणे सांभाळणे राहून गेले
घेउनी हातात आपण हात दोघे चालताना
फक्त मुक्कामास अंती पोचणे राहून गेले
- निलेश पंडित
२१ जून २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा