(वृत्त: व्योमगंगा)
बडवले जे जे सदा त्या त्या उरांचे काय झाले
आणि ते निष्प्राण होता अंकुरांचे काय झाले
कोरडे विज्ञान ज्यांनी शिकविले धर्मांधतेने
थोर तेजस्वी बड्या भाषणशुरांचे काय झाले
पोसल्यावर भूप दुर्गा गाउनी मांगल्य आम्ही
लावले नाहीत त्या कोमल सुरांचे काय झाले
राम गेले कृष्ण गेले यादवीने अंत झाला
नेमके मग खास मुष्टिक चाणुरांचे काय झाले
बेगडी खोटी मने चोखाळती जर भ्रष्ट वाटा
शिक्षणाने पेरलेल्या काहुरांचे काय झाले
- निलेश पंडित
७ ऑगस्ट २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा