दगडविटांच्या
कधी कुडाच्या
रंगहीन वा
रंगवलेल्या
डोईवरती
पेलुन छप्पर
तग धरणा-या
मतीहीनशा
गतीहीनही
कधीतरी मग
कोसळणा-या
भिंती आम्ही .....
कितीक वर्षे
झिजत थिजत का
उभ्या राहिलो
निरर्थक उरी
बाळगून ही
वेडी आशा
की नांदावी
आत आमच्या
निर्मळ प्रीती?
.... जिथे क्रूरशा
नियतीनेही
हेच शेवटी
लिहिले होते
भाळी अमुच्या
की आम्ही ज्या
मुलामाणसां
दिधली संतत
ऊब नि माया
आणि पाहिली
असंख्य स्वप्ने
पिढ्यापिढ्यांनी
- ऊब जपावी
तीच पुढे अन्
फुलवत जावी ....
त्यांनी निव्वळ
कृतघ्नतेने
विभागणा-या
मनामनांना
बांधित जावे
अभेद्य भिंती?
- निलेश पंडित
११ सप्टेंबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा