देशभक्ती वेड होते जीव गेला कोवळासा
टाकला होता कुणी दिल्लीत केवळ एक फासा
फोडता टाहो कुणी निमिषात तो आवाज दबतो
बातमी राष्ट्रीय होते टाकता कोणी उसासा
मातृभूमीची सुरक्षा हे खरे कर्तव्य आहे
ह्याच वाक्यावर पकडतो रोज तो जाळ्यात मासा
लोकसंख्या वाढण्याची कारणे इतिहास जाणे
लोकसंख्या खूप असणे हा बरा असतो खुलासा
मायभूमी जो तिला म्हणतो तशी त्याची नसे ती
आदिवासींची घरे बळकावणे हा न्याय खासा
वाट बघता येत राही नेहमी पुढचा महात्मा
लोकशाही देत जाते हाच आम्हाला दिलासा
- निलेश पंडित
२ जुलै २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा