हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

कथा

श्वापदांना मारले अन् जंगलेही जाळली
माणसे पण हिंस्त्र नंतर माणसांनी पाळली

ना कुणी सुलतान ना राजा कुणी ह्या वल्गना
कोणती ना कोणती शाही जिथे कवटाळली

त्या महात्म्याने जगासाठीच लिहिली पुस्तके
अन् जगाने शेवटी ती जाळली वा टाळली

मीपणा त्यागा असे प्रतिपादले ज्यांनी कुणी
नेहमी त्यांनी अहंता आपली कुरवाळली

नेहमी त्यांनी अहिंसेचीच महती मानली
माणसे हिंसक खुनी पदरी जरी सांभाळली

तो म्हणाला देवता प्रत्येक स्त्री दिसते मला
आणि मग जमले तसे प्रत्येक स्त्री न्याहाळली

उंटअरबाची कथा दिसते जिथे जावे तिथे
सारुनी कवितेस बाजूला गझल बोकाळली

अन्न द्यावे ज्या मुळांनी रक्त त्यांनी शोषले
नवल नाही खोड पूर्वी साल आता वाळली


- निलेश पंडित
४ नोव्हेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा