संकटांचा करत बसतो नवनवा संचय पुन्हा
त्यात लिहिण्याला गवसतो आगळा आशय पुन्हा
काळ सरतो जसजसा मीही तसा निर्ढावतो
काळही होतो नव्याने क्रूर अन् निर्दय पुन्हा
भरजरी असतो कधी हिणकस निपजतो क्षण कधी
रोज काळाचाच होतो नेहमी अपव्यय पुन्हा
हारतो लढतो तसा तो संपतो अंधारता
दिवस पुढचा उगवताना रुजवतो निश्चय पुन्हा
जिंकण्यासाठी पुन्हा मी डाव संपवलास तू
कोणता आता पराजय आणि कुठला जय पुन्हा
त्याच त्या असती लढाया सुष्टदुष्टांच्या इथे
तेचते कोट्यावधी धृतराष्ट्र अन् संजय पुन्हा
प्राप्त झाले अर्थ आता निर्भयाला नवनवे
शेवटी होईल का कोणी खरा निर्भय पुन्हा?
- निलेश पंडित
२४ जानेवारी २०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा