हा ब्लॉग शोधा

शनिवार, २९ मार्च, २०२५

अगोचर

 

संपणे अस्तित्व सर्वांचे भयंकर वाटते 

कल्पनेमधल्या भराऱ्या हेच उत्तर वाटते 


एकदोघांची खरी त्या नेत्रदीपक उन्नती 

वाढले पण बहुजनांपासून अंतर वाटते


भक्त रामाचा म्हणवतो देत आरोळी बडी

पाहता ते ध्यान त्याचे फक्त वानर वाटते


तेच ते असतात सगळे रूप केवळ बदलते

बोलणे प्रेषित महात्म्याचे अगोदर वाटते 


भासते वर जे सुवासिक दडविते दुर्गंध ते

वाहते साधेच पाणी स्वच्छ अत्तर वाटते


निर्मितीनंतर पुढे संहार अनपेक्षित घडे

माणसाला गवसलेलेही अगोचर वाटते


- निलेश पंडित 

३० मार्च २०२५


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा