हा ब्लॉग शोधा

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

दुरावा

 

हात शेवटच्या क्षणी कोणीतरी अलगद धरावा

संपता भर वेदनेचा चेहरा हसरा असावा 


जय पराजय भासले जे ते तसे नव्हते कधीही

झुंज ज्यांनी लावली त्यांचा असे तो फक्त कावा


परतते आली तशी ती भेटताना हासतेही

जीवघेणा वाटतो तक्रार नसल्याने दुरावा


पाहिल्या कित्येक मूर्त्या हार समया मेणबत्त्या

माणसासाठी कधी माणूस केवळ अवतरावा


राहतो स्थिर चेहरा अस्वस्थता नजरेत दिसते

सोडते ती चेहऱ्यावर नेहमी नकळत पुरावा


वाटले जे जे सुसंगत तो विरोधाभास होता 

राहिलो मी रोज धावत घ्यायला क्षणभर विसावा


- निलेश पंडित 

२१ सप्टेंबर २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा