(वृत्तः भूपतिवैभव)
समजलो ज्यास मी महाल बळकट माझा
ते केवळ होते नाजुक छोटे घरटे
आगळा मानले कल्पवृक्ष मी ज्याला
तो झुडूप होता एक रानटी खुरटे
मिळताच मला संकेत राजमार्गाचे
मी माझे त्याच दिशेला पाय वळवले
अज्ञात नागमोडी वाटेवरती त्या
वळणा-चकव्यांनी हातोहात फसवले
गेले फुंकत आयुष्य शंख युद्धाचे
मी ऐकत गेलो क्षणोक्षणी रणभेरी
चलबिचल मनाची सदैव लपवित गेलो
भीती-ईर्षेचे व्रत घेऊन दुहेरी
रेशीमस्पर्श हातास तुझ्या हाताचा
होताच वाटते घरटे महाल सुंदर
पायवाट ठरते राजमार्ग लढण्याचा
अन् ईर्षा करते कुरघोडी भीतीवर
- निलेश पंडित
२२ जून २०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा