हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

दिव्य

 

दिव्य नाही ज्यात काही तेच जगणे दिव्य ठरले

कैक वर्षे कैक महिने फक्त अवतरले व सरले


मोहिनी कित्येक स्वप्नांचीच सत्यावर पसरली

देह दु:खाशी झगडला, मन नशेवर रोज तरले


वाटले जगण्यात माझ्या तथ्य थोडे आढळावे

पथ्य तथ्याचेच जडले आणि हे जगणे बिथरले


फक्त गेला तो विचारत प्रश्न अवघड रोज त्यांना

संपल्यावर उत्तरे ते थेट धमकीवर उतरले


वाटली केव्हा कुणाला फक्त अनुकंपा कुणाची?

थोडका थरकाप, नंतर हायसे, नंतर विसरले



- निलेश पंडित

१८ मार्च २०२३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा